सोलापूर,दि.18: Sadashiv Bedge felicitated | “माझे दिड हजाराहून अधिक वेळा डायलेसिस होऊन देखील मी केवळ जिवंत आहे ते लेखन -वाचन आणि काव्यनिर्मितीच्या जोरावर !” वाचन आणि लेखनाने माणसाचे आयुष्य वाढते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी स्वतः. आहे. ” या शब्दात कवी माधव पवार यांनी आपली कवी म्हणून जडणघडण कशी झाली हे श्रोत्यांना सांगितले. निमित्त होते ग्रंथालय क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ स्वतःला झोकून देऊन काम करणारे सदाशिव बेडगे यांच्या सन्मानपत्र प्रदान कार्यक्रमाचे.
पंढरपूर येथील आयू फौंडेशनचे सदस्य संतोष चौंडावार, या वाचन प्रेमी अवलियाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करत सदाशिव बेडगे यांना त्यांच्या कार्यास रोख रक्कम ११००१ रुपये शाल व श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचे आयोजन केले होते. कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, लेखिका छाया उंब्रजकर, लेखिका वंदना कुलकर्णी, लेखक किशोर जाधव, सिद्राम मुद्देबिहाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनुराधा बेडगे व सदाशिव बेडगे यांनी सर्व उपस्थिताचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर सदाशिव बेडगे यांचा श्रीकांत डांगे यांच्या हस्ते सन्मान पत्र रोख रक्कम ११००१ रूपये शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
मंत्री चंडक शॅापिंग सेंटर मधील शांताबाई मुद्देबिहाळ सार्वजनिक वाचनालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कवी माधव पवार यांनी सदाशिव बेडगे यांचा गुणगौरव करत आपल्या कविता सादर करून उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. “लेखक कवी हे आपल्या तत्वावर ठाम असतात. ते कोणापुढेही भीक घालत नाहीत. आज साहित्यिकांना स्वतःच्या चरितार्थ नोकरी काम धंदा करावा लागतो. ही फार मोठी शोकांतिका आहे. कारण साहित्यिकांनी पूर्ण वेळ लेखनाचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी त्यांची पुस्तके वाचकांनी विकत घेऊन वाचली पाहिजेत. आज वाचन संस्कृती मोबाईल आणि इतर गोष्टींमुळे क्षीण झाली आहे. परंतु मी आशावादी आहे की पुन्हा वाचन चळवळ जोर धरेल. ” या शब्दात कवी माधव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी ग्रंथालय चळवळीस मदत करण्याची ग्वाही दिली. यासाठी शासन स्तरावर मुख्यमंत्री यांना भेटून ग्रंथालय आणि ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासन स्तरावर बैठक घेऊन त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यास मदत करण्याचा शब्द दिला. कर्मचारी यांचे प्रश्न न सुटल्यास आंदोलन करू असे आश्वासन डांगे यांनी दिले.
सन्मानास उत्तर देताना सदाशिव बेडगे यांनी, ” आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणीत ग्रंथालय आपल्या दारी हा उपक्रम मागील ३० वर्षा पासून चालवत आहे. वास्तविक पाहता शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार मिळणेसाठी सातत्याने चार वर्षे प्रस्ताव दिला पण पुरस्कार मिळाला नाही मिळाला संतोष चौडावार परिवाराने दिलेला सन्मान हा खूप मोठा आनंद देणारा आहे हा पांडुरंगाने दिलेला आर्शिवाद आहे.राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पोटापुरते वेतन मिळण्यासाठी सातत्याने विविध मार्गाने शासनाकडे पाठपुरावा करत आहे. वाचन संस्कृती वाढावी, गतिमान व्हावी यासाठी पुढील आयुष्यात देखील या सन्मानाने दिलेली ऊर्जा घेऊन काम करत राहणार आहे. ” या शब्दात आपले मत व्यक्त केले.
संतोष चौडावार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमात येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, आपण समाजाचे देणे लागतो त्यासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळावे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी लेखिका वंदना कुलकर्णी, छाया उंब्रजकर, लेखक किशोर जाधव, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे आदींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अनुराधा बेडगे, धनश्री बेडगे, नरसिंह मिसालोलू, सिध्दाराम हालकुडे, जगदीश गिडवीर, मदन तोरवी आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक रमेश व्हटकर, संतोष स्वामी, रामकृष्ण बंडेवार, सिध्दाराम हालकुडे, जगदीश गिडवीर, मदन तोरवी व वाचक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. सिद्धेश्वर उकळे यांनी केले.