सोलापूर,दि.१५: RokThok | नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षात युती होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस यांनी राज यांची भेट घेतली. मुंबईसह अनेक ठिकाणी राज आणि उध्दव यांनी एकत्र यावे याकरिता कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Saamana RokThok)
रोखठोक | RokThok
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी वांद्र्याच्या ‘ताज’ हॉटेलात भेटले. दोघांत मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी. श्री. फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत.

फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस भेटीत विचारला असावा अशी आशा आहे. मोदी व शहा यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष… | Saamana RokThok
फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे इतकेच.
श्री. मोदी दिसले की…
भारतीय लोकशाही ही निरक्षरांची लोकशाही आहे, तरी ती शहाणी आहे असे समाधान मानणे म्हणजे दारात बांधलेल्या प्राण्यांनाही किती उत्तम समजूत आहे असे म्हणण्यासारखे आहे. वृत्तवाहिन्यांच्या एकांगी प्रचाराने जेथे अंधभक्त बनलेले सुशिक्षित प्राणी माना डोलावतात तेथे निरक्षरांचे काय? त्यात ‘खोट्या डिग्री’चे शिक्षण असलेले पंतप्रधान लाभले की, विचारायची सोय नाही. इंदिरा गांधी दूरदर्शनवर दिसल्या की, पूर्वी महिलावर्ग श्रद्धेने हात जोडीत. आता श्री. मोदी दिसले की जोडतात, असे मी भाजपच्या लोकांकडून ऐकले आहे. सुशिक्षित असूनही अज्ञानी असा एक मोठा वर्ग समाजात असतो. तो वर्ग अर्धवट वाचत असतो, काहीतरी चुकीचे ऐकत असतो व त्यावर मत ठरवून काहीतरी बोलत असतो.
अशा सर्वांनी मिळून भारतीय लोकशाहीचा शिळा वडापाव केला आहे व त्याचे देशातील अंधभक्तांना कौतुक आहे. प्रे. ट्रम्प यांनी दबाव टाकून पाकिस्तानविरुद्धची लढाई भारताला थांबवायला सांगितली. ही लढाई जमिनीसाठी नव्हती, तर भारतीय हद्दीत पाकिस्तानने केलेल्या दहशतवादाविरुद्ध होती. प्रे. ट्रम्प यांनी ती थांबवली. विरोधी पक्षांनी यावर टोकदार प्रश्न विचारू नयेत म्हणून मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांना जगभ्रमणासाठी पाठवले व भारतात शांतता प्रस्थापित केली.