सोलापूर,दि.१५: सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राची केली पाहणी केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठे विधान केले आहे. सध्या सोलापूर शहरातील बऱ्याच भागात आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. तर बऱ्याच भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सोलापूर शहरात अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे.
काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे?
उजनी धरणातून समांतर जलवाहिनीद्वारे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुधारणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सोलापूरला अतिरिक्त पाणी उपलब्धत होणार असून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली. शनिवारी या जलवाहिनीतुन पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले. या पाण्याची तसेच सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी दुपारी केली.
यावेळी आ. देवेंद्र कोठे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष (पूर्व) शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
दररोज पाणीपुरवठा…
पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, पाकणी येथील नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महापालिकेचे नऊ कोटी रुपये वाचविण्यात यश आले आहे. नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून दोन वेळा पाणी सोडण्याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करणे हे इथले लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्दही नक्की पाळला जाईल. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत, असेही पालकमंत्री गोरे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी ८५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था कामानंतर सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
दररोज पाणी देण्याचा शब्द: आमदार देवेंद्र कोठे
सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टीने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विकासकामांनी वेग धरला असून सोलापूरकरांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत, असे आ. देवेंद्र कोठे यांनी सांगितले.