मुंबई,दि.24: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे यासाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता असून विलिनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती आहे. आता या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं यासाठी आंदोलन करत आहेत. विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयासमोर असून समितीच्या अहवालानंतर यावर निर्णय होणार आहे. पण तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळामध्ये यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यावेळी या प्रस्तावाला अजित पवारांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यानंतर याला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.