सोलापूर,दि.26: शिवसेना नेते (उध्दव ठाकरे गट) तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून अभिनेत्री कंगना राणावत आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट काढण्यात आला होता. या चित्रपटात कंगना राणावतने भूमिका साकारली होती. या चित्रपटावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.
रोखठोक संजय राऊत
इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. कंगना राणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा `इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला. बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद!
खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही…
कंगना राणावत हिचा `इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याने त्यांनी `इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे.
इतिहासाची क्रूर थट्टा
इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. ज्यांनी देशाच्या जडणघडणीत काहीच योगदान दिले नाही, असे आजचे सत्ताधीश व त्यांचे आंधळे अनुयायी हे सर्व करत आहेत. कंगना राणावत व त्यांच्या `इमर्जन्सी’ चित्रपटाने जे भारावून गेले त्यांना भारत कळलाच नाही. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी. आणीबाणीच्या अंमलबजावणीत काही अतिरेक झाले असतील. असा अतिरेक सध्या रोजच होत आहे व इतिहास भविष्यात त्याचेही मूल्यमापन करणारच आहे.
भारताचा एक भाग असलेल्या मुंबईस (जी महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे) मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगना राणावतसारख्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणी लावली हे सत्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेची गरज म्हणून लावलेल्या आणीबाणीस 50 वर्षे होऊन गेली. तरीही काही लोक ती राख अंगाला फासून फिरत आहेत. पोलिसांनी व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नयेत असे जयप्रकाश नारायण, चरणसिंगांसारखे नेते जाहीर सभांतून चिथावणी देत होते.
जॉर्ज फर्नांडिस यांनी तर `बॉम्ब’ बनविण्याचा कारखानाच काढला होता. आज पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात व्यंगचित्र काढले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जाते. हे आणीबाणीचेच नवे रूप आहे. जॉर्ज यांना इंदिरा गांधींना बॉम्बने उडवायचे होते व त्याची प्रात्यक्षिके सुरू होती. आज पंतप्रधान व एखाद्या मुख्यमंत्र्यास निनावी धमकीचा फोन आला, पत्र आले तरी संशयावरून लोकांना तुरुंगात सडवले जाते. आणीबाणीत स्मगलर्स, काळाबाजारी, गुंड यांना तुरुंगात डांबले हे कंगना राणावत यांनी सिनेमात दाखवले नाही. देशाला शिस्त लावणे व अराजकवाद्यांना वठणीवर आणणे यासाठी आणीबाणी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीचे समर्थन केले होते. तरीही भाजप व शिवसेना 25 वर्षे एकत्र नांदले, सत्ता भोगली त्याचे काय?