अमरावती,दि.21: कथित त्रिपुरा घटनेवरून महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्रिपुरा कथित हिंसाचार प्रकरणानंतर अमरावतीत (Amravati Violence) पडसाद उमटले होते. रझा अकादमीकडून 12 ऑक्टोबरला शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर मोर्चाला हिंसक वळण लागले होते.
भारतीय जनता पार्टीने 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली होती. 13 नोव्हेंबरलाही हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर (Amravati Violence) आता परिस्थिती हलूहळू पूर्ववत येण्यास सुरुवात झाली आहे.
या हिंसाचारानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांना हिंसाचार झालेल्या भागातील नागिरकांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
जाणीवपूर्वक भडकवण्यात आलं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या घटनाच घडल्या नाहीत त्याच्या संदर्भात माहिती पसरवण्यात आली. सीपीआयएमचं एक ऑफिस होतं ज्याला आग लागली होती त्याते फोटो होते. दिल्लीतील एका कॅम्पमध्ये लागलेल्या आघीचा व्हिडीओ होता. काही रोहिंग्यांचे फोटो होते तर काही पकिस्तानातील एका शहरातले फोटो होते. अशा फोटोंच्या आधारे देशभरात जाणीवपूर्वक एका समाजाला भडकवण्यात आलं.
मोर्चे पूर्वनियोजित होते
आमचं तर स्पष्ट मत आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणातील मोर्चे एकाच दिवशी, राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून निघतात. हे मोर्चे पूर्वनियोजित मोर्चे होते. नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघाले. सर्वप्रथम याची चौकशी झाली पाहिजे की, या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे कुणी प्लॅन केले? त्यांची यामागची भूमिका काय होती? असे सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले.
मोर्चाला परवानगी होती का?
महाराष्ट्र आणि देशात अराजकता निर्माण झाली पाहिजे?, सामाजिक सलोखा बिघडला पाहिजे, दंगल झाली पाहिजे अशा माणसिकतेतून रचलेला हा कट होता का? याचीही चौकशी झाली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून 12 तारखेला एक मोर्चा अमरावतीत निघाला. पहिली गोष्ट म्हणजे या मोर्चाला परवानगी होती का? होती तर किती लोकांची परवानगी होती आणि कुणी परवानगी दिली होती. ज्यांनी परवानगी दिली होती ती काय विचार करुन दिली होती? याचीही चौकशी झाली पाहिजे असंही फडणवीस म्हणाले.
एका विशिष्ट धर्माची दुकानांवर हल्ला
मोर्चा झाल्यावर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्यावेळी दुकाने टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं. याच्या पाठिमागची भूमिका स्पष्ट दिसतेय की, यातून दंगल घडवाची होती म्हणून एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकाने आणि व्यापाऱ्यांवर हल्ला केला गेला. त्यातून मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिॲक्शन होती. 13 तारखेला जी हिंसा झाली त्याचं समर्थन मी बिलकूल करणार नाही. कुठल्याच हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आता मंत्री, पालकमंत्री, सर्वचजण 12 तारखेची घटना डीलिट करुन केवळ 13 तारखेची एकच घटना आहे असे चित्र निर्माण करतायत. ते चित्र चुकीचं आहे. 12 तारखेची घटना डीलिट करता येत नाही. 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडलीच नसती. आता सर्व कारवाई सुरू आहे ती 13 तारखेच्या घटनेसंदर्भात सुरू आहे. टार्गेट करुन कारवाई केली जातेय, भाजप नेत्यांना अटक केलं जात आहे. एका घटनेसाठी 4 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकतर्फी कारवाईला विरोध करणार, लोकांना विणाकारण टार्गेट करणं चुकीचं आहे. मोर्चामागे मोठं षडयंत्र आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.