सोलापूर,दि.12: अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत परखड मत मांडले. नसीरुद्दीन शाह त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सामाजिक आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करण्यापासून ते कधीही मागे हटत नाहीत. चित्रपटसृष्टीवरील राजकीय प्रभावावर ते अनेकदा उघडपणे आपले मत मांडतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्याने देशाचे पंतप्रधान, देशातील मुस्लिम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या TDP आणि नितीश कुमार यांच्या JD(U) सोबत NDA मध्ये सत्ता वाटपाशी संबंधित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. नसीरुद्दीन शाह यांच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा होत आहे.
काय म्हणाले नसीरुद्दीन शाह? | What Did Naseeruddin Shah Say
‘द वायर’शी बोलताना नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आले की, गेल्या आठवड्यात भाजपला बहुमत मिळाले नाही, 10 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी आहे आणि युतीची गरज आहे, हे जेव्हा तुम्हाला कळले तेव्हा तुमच्या मनात काय आले? यावर अभिनेता म्हणाला, ‘सुरुवातीला मी खूश होतो. मग मी स्वतःशीच म्हणालो की, आता आपण सर्वांनी पराभूत, विजेते, हिंदू, मुस्लिम आणि सरकार यांचा विचार करण्याची वेळ आली आहे. सत्तेची वाटणी हे नरेंद्र मोदींसाठी कडू औषध ठरेल. समस्या अशी आहे की ते आयुष्यभर पंतप्रधान राहतील असा विश्वास आहे आणि दुसरी अडचण अशी आहे की ते सर्वकाही वैयक्तिकरित्या घेतात. त्यांचे ‘मनोरुग्ण’ चाहतेही असेच आहेत.
हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता करणे…
नसीरुद्दीन शाह यांनी मुस्लिम समाजाच्या बंधुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर अधिक भर दिला. यावेळी त्यांनी मुस्लिमांना हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता करणे थांबवून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला दिला. पुढे ते म्हणाले, “मदरशांच्या ऐवजी शिक्षणांवर मुस्लिमांनी लक्ष द्यायला हवं. फक्त धार्मिक शिक्षण न घेता आणि आधुनिक विचारांची चिंता करायला हवी. मुस्लिमांनी जाग होण्याची हीच वेळ आहे’. यासोबतच कॅबिनेटमध्ये एकही मुस्लिम नाही. ही गोष्ट आश्चर्यचिकत करणारी नसल्याचं त्यांनी म्हटलं.
अभिनेता शाह पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींना कोणीही प्रश्न विचारला नाही की, जर त्यांना देशाची सेवा करायची होती, तर ते सैन्यात भरती का झाले नाहीत? गेली अनेक वर्षे ते कमी समजूतदार गोष्टी बोलत आहे. पंतप्रधानांना देवाने पाठवले आहे किंवा ते स्वतःच देव आहेत असे मानत असतील तर सगळ्यांना त्याची भीती वाटायला हवी.
या देशात बरेच काही चुकीचं होते
नसीरुद्दीन म्हणाले, ‘मोदींना विरोध करणे खूप सोपे आहे. हे सत्य आहे की मोदी सत्तेवर येण्यापूर्वीही या देशात बरेच काही चुकीचं होते. आपल्या देशात धर्मांमध्ये नेहमीच वैमनस्याची भावना राहिली आहे. मला पंतप्रधान मोदींना इस्लामिक टोपी घातलेलं पाहायचं आहे. त्यामुळे देशातील मुस्लिम लोकांना एक संदेश मिळेल की ते कधीच त्यांच्या विरोधात नव्हते. ते त्यांचे शत्रू नाहीयेत. त्यामुळे खूप मदत होईल’. सध्या नसीरुद्दीन यांची ही मुलाखत प्रचंड चर्चेत आहे.