मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपली, नितीन गडकरी पुन्हा रस्ते वाहतूक मंत्री तर…

0

नवी दिल्ली,दि.10: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी राष्ट्रपती भवनात आपल्या नवीन मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. मोदी सरकार 3.0 मध्ये एकूण मंत्र्यांची संख्या 72 असेल, त्यापैकी 30 मंत्री मंत्रिमंडळाचा भाग असतील.

याशिवाय 5 मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. त्याचबरोबर 36 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. अशा अनेक मंत्र्यांचा मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये समावेश करण्यात आला आहे, जे मोदी सरकार 2.0 मध्ये देखील मंत्री होते.

कुणाला कोणते मंत्रालय?

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर सुमारे 24 तासांनंतर विभागांची विभागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रालय दिले आहे. राजनाथ सिंह पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालय पाहणार आहेत.

नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री करण्यात आले आहे. तर एस जयशंकर यांना मोदी 3.0 मध्ये परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले आहे. अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात राज्यमंत्री असतील.

निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे एकमेव खासदार आणि मोदी मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य (79) जीतन राम मांझी यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शोभा करंदलाजे यांना या खात्यात राज्यमंत्री करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण आणि पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच त्यांना नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. श्रीपाद नाईक यांची या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा पहिलाच निर्णय

मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पीएम आवास योजनेला आणखी वाढ करण्यात आली आहे. पीएम आवास योजनेंतर्गत तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी 4.21 कोटी घरे बांधली गेली आहेत. सोमवारी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, ज्यात हा निर्णय घेण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here