मुंबई,दि.8: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाला व महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात 31 जागांवर महाविकास आघाडी तर 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपानं आज पदाधिकारी, आमदारांची बैठक आयोजित केली होती.
देवेंद्र फडणवीसांनी पराभवाचं विश्लेषण करत विरोधकांनी जे नॅरेटिव्ह तयार केलं त्यात ते यशस्वी झाले असं सांगत आगामी काळात ताकदीने जिंकू असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण अमित शाह यांची भेट घेऊन याबद्दल सांगितलं असल्याचा खुलासा केला. तसंच यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे.
आपण तीन पक्षांसाठी तयारी केली होती. पण चौथ्या पक्षासाठी तयारीच केली नाही सांगत ते आपल्या अपयशाचं मुख्य कारण असल्याचं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना जनतेनं समर्थन दिले, तिसऱ्यांदा सरकार आलं. ओडिशा, आंध्र प्रदेश याठिकाणी आपलं सरकार आलं. मागील 3 निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 43.9 टक्के आणि महायुतीला 43.6 टक्के आहेत. फक्त .3 टक्के इतकं अंतर आहे. पण त्याचा परिमाण तिकडे 31 आणि इकडे 17 आहेत. महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख, आपल्याला 2 कोटी 48 लाख मतं मिळाली आहेत. 2 लाख मतं जास्त मिळाली आहेत. मुंबईत त्यांना 24 लाख आणि आपल्याला 26 लाख मतं आहेत. पण त्यांना 4 आणि आपल्याला 2 जागा मिळाल्या आहेत. आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो. चौथा पक्ष खोटा नरेटिव्ह होता. या 3 पक्षांना रोखलं तर यशस्वी होईल असं आपल्य़ाला वाटलं होतं. पण चौथ्या पक्षासाठी आपण तयारीच केली नाही. त्यामुळे त्याला रोखू शकलं नाही. संविधान बदलणार हा विषय खालपर्यंत गेला आणि आपण तो नीट खोडू शकलो नाही. ते जे खोटं बोलत होते ते सामान्य माणसाला खरं वाटू लागलं होतं,” असा दावा त्यांनी केला.
ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या…
“मराठा समाजाने नरेटिव्ह तयार केला. आपण दोन्ही वेळा आरक्षण दिलं. सारथी, फी सवलती, या सगळ्या गोष्टी आपल्याच काळात झाल्या. 1980 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पारड्यात मतं गेली आहेत. याचा अर्थ हे पण टिकणार नाहीत. नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात ते यशस्वीही झाले. पण जास्त यशस्वी झाले नाहीत अन्यथा 43.6 टक्के मतं मिळाली नसती. आपल्याला 2019 पेक्ष कमी मतं मिळालेली नाहीत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“विधानसभेत हे चित्र बदलणं कठीण नाही. खोट्या नरेटिव्हचा काळ आता संपला आहे. विधानसभेसाठी फक्त 3 ते 3.5 टक्के मतं बदलायची आहेत. पुन्हा एकदा आपण मैदान जिंकू याचा मला विश्वास आहे. मी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहेत. जोपर्यंत महायुतीचा झेंडा फडकणार नाही, तोप्रयंत थांबणार नाही,” असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.