सोलापूर,दि.26: Saamana RokhThok: ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सामनाच्या रविवार विशेष ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊतांनी मोठा आरोप केला आहे.
सामना रोखठोक जसेच्या तसे | Saamana RokhThok
नरेंद्र मोदी व अमित शहा यांची राजवट 4 जूननंतर संपत आहे याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले. मोदी व शहा यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी-शहांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण केले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही, पण मोदी हवेत. “माती खाऊन जगू” असे बोलणारे अंधभक्त या काळात दिसले, पण ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले. त्यांनी देशाला गुलाम केले व दहा वर्षांत गुलाम जन्माला घातले. तरीही गुलाम बंड करतोच. रशिया ज्याने शक्तिमान केला तो जोसेफ स्टालिन. स्टालिनच्या मृत्यूपूर्वी काही दिवसच भारताचे हायकमिशनर श्री. के.पी.एस. मेनन यांना स्टालिनची भेट मिळाली होती. स्टालिन त्यांना म्हणाला, “आमचा शेतकरी साधा माणूस आहे. लांडगा अंगावर आला तर तो त्याला उपदेश करीत नाही, सरळ ठार करतो! लांडग्याला हे समजते व तोही त्यामुळे अंगावर येत नाही.” भारताच्या शेतकऱ्याने तेच केले आहे.

योगी को बचाना है, तो मोदी को जाना है |RokhThok
4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.
पुलवामा
मोदी-शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राचे केलेले हे अध:पतन. तरीही महाराष्ट्र विकला जाणार नाही व किमान 32 जागांवर मोदी-शहा मित्रमंडळाचा पराभव होईल. महाविकास आघाडीने झंझावात उभा केला. त्यामुळे मोदी-फडणवीस-शिंदे उडून गेले. अमित शहांची दखलही महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्रात पैशांचे राज्य या लोकांनी निर्माण केले. तोच महाराष्ट्र दिल्लीतील पैशांचे राज्य उखडून फेकेल. बदल नक्की होतोय. मोदींच्या बोलण्यातला व अंगातला जोर ओसरलाय हे दिसत आहे. 2019 ची निवडणूक ‘पुलवामा’ हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली.
2024 ची निवडणूक मोदी-शहा त्याच जवानांचे शाप-तळतळाट यामुळे हरत आहेत. जवानांचे आत्मे भटकतच होते. 4 जूनला त्यांना मोक्षप्राप्ती होईल.