मुंबई,दि.17: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत छत्रपती शिवाजी पार्कवर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांनी मराठीत मुंबईकरांना माझा राम राम..कसे आहात तुम्ही? असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
‘मुंबई हे शहर फक्त स्वप्न पाहात नाही तर ते स्वप्न जगणारं शहर आहे. काही करण्याचा संकल्प घेऊन चालणाऱ्या लोकांना मुंबईनं कधी निराश केलं नाही. या ड्रिम सिटीमध्ये मी तुमच्यासमोर 2047 चं ड्रिम घेऊन आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून विकसित भारत बनवायचा आहे. त्यामध्ये मुंबईची मोठी भूमिका आहे.’ असे मोदी म्हणाले.
शिवतिर्थावरील या जमीनीवर बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषणाचे हुंकार उमटले. ही मंडळी सत्तेसाठी दिवसरात्र सावरकरांना दिवस-रात्र शिव्या देणाऱ्या लोकांसोबत गेली आहेत. निवडणूक संपताच राहुल गांधी सावरकरांवर टीका करण्यास सुरुवात करतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
कलम 370 हटेल हे अशक्य वाटत होतं. पण ती भिंत मी गाडली आहे. जगातील कोणतीच ताकद पुन्हा 370 आणू शकत नाही. राम मंदिर उभारणीसाठी आपण 500 वर्षे लढा दिला. असेही मोदी म्हणाले.
गांधीजींच्या सल्ल्याने स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित झाली असती तर आज भारत किमान पाच दशकांनी पुढे गेला असता, असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्व व्यवस्थांमध्ये काँग्रेसीकरणामुळे पाच दशके देशाची नासधूस झाली आहे.
शिवसेनेची ओळख ही घुसखोरांच्या विरोधात उभी राहणारी संघटना अशी होती. आज नकली शिवसेना CAA ला विरोध करत आहे. आपल्या देशात नकली सेनेइतकं मतपरिवर्तन कोणत्याही पक्षाचं झालेलं नाही. ज्या कसाबनं मुंबईवर हल्ला केला, त्यांना ही लोकं क्लिन चीट देत आहेत. पाकिस्तानची जगात कुणीही ऐकत नाही. हे आघाडीचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.
बाबासाहेब आंबेडकर धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या विरोधात होते. संविधान सभेचं यावर एकमत होतं. या मंडळींना दलित, आदिवासी, ओबीसी यांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं आहे. अशी टीका मोदींनी केली.