मुंबई,दि.27: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा उमेदारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याची घोषणा करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
जरांगे पाटील यांचा पाठिंबा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीची माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल आमची सविस्तर चर्चा झाली. ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व दिलं जात नव्हतं, त्यांना प्रतिनिधित्व देण्याबाबतही बैठकीत आमची चर्चा झाली. तसंच मुस्लीम आणि जैन समाजालाही वाटा देण्याबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांवरील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे.
“वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची काल बैठक झाली. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जे आमच्याबरोबर समजोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही जरांगे-पाटील फॅक्टर लक्षात घ्यायला हवा असं आम्ही सुचवलं होतं. मात्र त्यांनी तो लक्षात घेतलं नाही. त्यामुळेच काल मी, फारुख अहमद आणि किसन चव्हाण यांनी जरांगे पाटलांबरोबर चर्चा केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याची पहिल्या फेजची तारीख आहे. त्यामुळे आज पहिली यादी जाहीर केली,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.