मुंबई,दि.21: आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला करण्यात आला आहे. आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील जामुगुरीघाट येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर भाजपा समर्थकांनी हल्ला केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राहुल गांधींच्या आगमनापूर्वी भाजप कार्यकर्ते त्यांच्या मार्गावर मोर्चा काढत होते, तेव्हा भारत जोडो न्याय यात्रेची काही वाहने त्या भागातून जात होती. भाजप समर्थकांनी काही वाहनांची तोडफोड केली आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या कॅमेरा क्रूवरही हल्ला केल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, काही मिनिटांपूर्वी सोनितपूरमधील जुमुगुरीघाट येथे माझ्या गाडीवर बेकायदेशीर भाजप कार्यकर्त्यांच्या जमावाने हल्ला केला होता आणि विंडशील्डवरील भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकरही फाडले होते. त्यांनी पाणी फेकले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या, पण आम्ही शांतता राखली. आणि वेगाने पुढे सरकले. आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना ते म्हणाले की, निःसंशयपणे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे सर्व घडवून आणत आहेत. आम्ही घाबरणार नाही, लढत राहू, असे ते म्हणाले.
त्याच वेळी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी X वर ट्विट करत पोलिसांना या प्रकरणाची नोंद करून आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेचा आज चौथा दिवस आहे. जी बिसवंत जिल्ह्यातून सोनितपूरमार्गे नागावकडे जात आहे. राहुल गांधी यांनी नागाव जिल्ह्यातील कालियाबोर येथील सभेला संबोधित करण्यापूर्वी हा कथित हल्ला झाला.