नवी दिल्ली,दि.१६: Kapil Sibal On Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ॲड. कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. अपात्रतेची कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबवता येत नाही. दुसरे अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी त्यावर निर्णय घ्यायला हवा होता, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. राज्यपालांची भूमिका असंवैधानिक असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.
अपात्रतेची कारवाई अविश्वासाचा प्रस्ताव आल्यानंतरही होऊ शकते. अपात्रतेची कारवाई आणि अविश्वास प्रस्ताव या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राज्यपाल फक्त राजकीय पक्षांशी चर्चा करू शकतात गटाशी नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
राज्यपाल यांनी कोणत्या घटनात्मक अधिकारात बहुमत चाचणी बोलावली? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने बहुमत चाचणी बोलावली असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. फुटलेला एक गट म्हणजे राजकीय पक्ष नाही.
निवडणूक पूर्व पक्षांची आघाडी, निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष, निवडणुकीनंतरची पक्षांची युती आणि निवडणुकीनंतरची पक्षांची आघाडी या सर्व गोष्टींमध्ये पक्षांना मान्यता आहे. जर संपूर्ण शिवसेना भाजपाबरोबर गेली, तर राज्यपाल बहुमत चाचणी घेऊ शकतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.