नवी दिल्ली,दि.२८: Maharashtra Political News: सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. सत्तासंघर्षाची ही सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर आमदारांची अपात्रताच संशयाच्या भोवऱ्यात असेल, तर मग बहुमताचा प्रश्न कसा उभा राहातो? सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल केला.
७ अपक्ष आणि ३४ आमदार म्हणत होते की त्यांचा सरकारवर विश्वास नाही. मग जर सरकार पाडण्यासाठी हे कारण ठरलं असेल, तर हे कारणच मुळात अपात्रतेचं मूळ ठरत नाही का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांना विचारला.
बहुमत चाचणीचं कारण हे थेट अपात्रतेच्या प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे इथे खरी समस्या निर्माण झाली आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवले.
तुम्ही पक्षाकडे जाऊन सांगितलं का नाही की आता आम्ही मूळ पक्ष आहोत? सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला विचारणा.
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असलेल्या आमदारांना वगळूनही आम्ही बहुमतामध्ये आहोत. असे शिंदे गटाचे वकील नीरज कौल म्हणाले.
फक्त अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे म्हणून तुम्ही एखाद्या आमदाराला विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापासून रोखू शकत नाही, असे कौल म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना राज्यपालांचं सरकार स्थापनेवेळचं पत्र वाचून दाखवण्याचे आदेश दिले. कौल यांनी ते पत्र वाचून दाखवलं.
राज्यपालांच्या पत्रात फक्त एवढंच म्हटलंय की ७ अपक्षांनी पाठिंबा काढलाय आणि ३४ सदस्य म्हणतायत की त्यांची इच्छा आहे की त्यांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचंय. पक्षामध्ये महिन्याभरापूर्वीपर्यंत कोणतीही फूट नसताना महिन्याभरात ते सरकार विश्वासदर्शक ठरावाचा सामना कसा करू शकते? न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल.