नवी दिल्ली,दि.9: PM Modi On Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Rajya Sabha) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी यांनी गुरुवारी (9 फेब्रुवारी) संसदेत पुन्हा एकदा काँग्रेसवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, विरोधक आमच्यावर राज्य सरकारांना त्रास देत असल्याचा आरोप करतात, पण उलट काँग्रेसने सर्वाधिक राज्य सरकारे पाडली आहेत.
कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसने केला | PM Modi On Congress
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घटनेच्या कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर केल्याची आठवण दिली. ईडी आणि सीबीआयच्या मदतीने केंद्र सरकार बिगर-भाजपशासित राज्यांच्या सरकारांना त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर मोदी म्हणाले, ‘आमच्यावर राज्य सरकारला अडचणीत आणल्याचा आरोप केला जातो, पण इतिहास पहा आणि कोणत्या पक्षाने कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर केला ते पहा. काँग्रेसने एकूण 90 वेळा निवडून आलेली सरकारे पाडली. यापैकी फक्त इंदिरा गांधींनी कलम 356 चा 50 वेळा वापर केला.

मी शरद पवारांचा खूप आदर करतो | PM Modi in Rajya Sabha
मोदी पुढे म्हणाले, केरळमध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार निवडून आले, जे पंडित नेहरूंना आवडले नाही आणि त्यांनी सरकार पाडले. तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांचे सरकारही बरखास्त करण्यात आले होते. शरद पवार यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी शरद पवारांचा खूप आदर करतो. 1980 मध्ये त्यांचेही सरकार पाडण्यात आले. काँग्रेसने प्रत्येक प्रादेशिक नेत्याला त्रास दिला. ही काँग्रेसच्या राजकारणाची पातळी आहे, अशी टीका त्यांनी केली.
हे विज्ञान आणि तंत्रज्ञानविरोधी लोक
पंतप्रधान पुढे म्हणाले, काँग्रेस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचेही विरोधक आहेत. त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना देशाची चिंता नाही, त्यांना त्यांच्या राजकीय चढ-उतारांची चिंता आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये आज देश जागतिक आघाडीवर आहे. डिजिटल इंडियाच्या यशाने आज जगभरात भारताचे नाव उचांवले आहे, असेही मोदी म्हणाले.