बेळगाव,दि.19: Border Dispute: बेळगावात कर्नाटक सरकारकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Issue) चिघळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणीही सीमावादावर बोलणार नाही असे म्हटले होते. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) बेळगावात आजपासून सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत जो तह करण्यात आला त्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ फासण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले असून स्टेज हटवण्यात आला आहे. काल मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आता अचानक काम थांबविण्यात आले आहे.
बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रविंद्र गाडादी म्हणाले, मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र देखील देण्यात आले. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तर काल रात्री स्टेज उभारण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आज अचानक पोलिसांनी स्टेजचे काम थांबवले असून ही आमची गळचेपी असल्याची असल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक देखील घेतली. आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले मात्र आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहे. तसेच सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील देसाई म्हणाले.
महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नाही, अशी कर्नाटक सरकारची भूमिका आहे या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केले आहे. बेळगावच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.