नागपूर,दि.11: शॉर्टकटचे राजकारण करू नका, स्वार्थी नेत्यांना उघडं पाडा असे PM नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी मोदींना विरोधकांवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उदघाटन
जवळपास 75 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचं उदघाटन आणि भूमीपूजन मोदींनी केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रकल्पांची भेट देताना जनतेचं अभिनंदन तर केलंच पण विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. देशाच्या राजकारणात काही ‘शॉर्टकट’ पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघड पाडण्याचं काम आता जनतेनं करायला हवं, असं आवाहन मोदींनी केलं.
नेत्यांना उघडं पाडण्याचं काम जनतेनंच सुरु करावं: नरेंद्र मोदी
“देशातील करदात्यांचे पैसे लुटायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हे लक्ष्य ठेवणारे पक्षच देशाचे सर्वात मोठे शत्रु आहेत. ‘आमदनी अठ्ठनी अन् खर्चा रुपया’ करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. देशाला अशा वाईट नितीपासून वाचवलं पाहिजे. काही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याचं काम करत आहेत. शॉर्टकट पक्षांनाही माझं आवाहन आहे की स्थायी विकासाचं महत्व समजून घ्या. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी भविष्याचा विचार होणं गरजेचं आहे. पुढच्या 25 वर्षांच्या विकासाच्या व्हिजननं सरकार काम करत आहे. पण काही पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी देशाचं नुकसान करत आहेत. आता अशा नेत्यांना उघडं पाडण्याचं काम जनतेनंच सुरु करावं”, असं आवाहन करत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

शॉर्टकटने देश चालत नाही: नरेंद्र मोदी
‘पहिली औद्योगिक लाट आली होती, त्याचा फायदा भारताला घेता आला नाही. आता चौथी लाट आली आहे, अशी संधी भारत सोडणार नाही. अशी संधी भारताला कधी मिळत नाही. शॉर्टकटने देश चालत नाही. देशाच्या विकासाठी सतत काम करावे लागले. दूरदृष्टीचा विकास गरजेचे असते. इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. एक काळ होता साऊथ कोरिया गरीब देश होता, पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून हा देश पुढे गेला आहे. लाखो भारतीयांना तिथे रोजगार मिळतोय, असंही मोदी म्हणाले.
डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती प्राप्त: नरेंद्र मोदी
“महाराष्ट्रातील विकास कामांचं उदघाटन करताना आज मला आनंद होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार येताच विकास कामांना गती प्राप्त झाली आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती प्राप्त झाली आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. कोणताही पायाभूत सुविधांचा प्रकल्प करताना त्याला ह्युमन टच गरजेचा असतो. समृद्धीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.