बाहेरचीला बनारसी आणि घरची उपाशी अशी भाजपाची अवस्था झाली आहे: सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी थेट विद्यमान सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं आहे

0

कर्जत,दि.१८: बाहेरचीला बनारसी आणि घरची उपाशी अशी भाजपाची अवस्था झाली आहे अशी जोरदार टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपावर (BJP) केली आहे. “कामाला लागा! २०२३ मध्ये निवडणूका लागणार म्हणजे लागणार” असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विद्यमान सरकार कोसळेल असं भाकित केलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमुळेच सरकार कोसळेल असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. भाजपामध्येच सध्या फार धुसपूस असल्याने सरकार कोसळेल असा दावा अंधारेंनी केला आहे.

कर्जतमध्ये ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या प्रबोधन यात्रेदरम्यान अंधारे बोलत होत्या. अंधारे यांनी थेट विद्यमान सरकार कोसळणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं. या मागील कारण काय असेल याबद्दल सांगताना त्यांनी भारतीय जनता पार्टीमधील अनेकजण शिंदे गटाला दिल्या जात असलेल्या महत्वामुळे अस्वस्थ असल्याचा दावा केला. “हे सरकार पडणार असं मी म्हटलं की काही लोक विचारतात ताई कशावरुन म्हणताय? तर मी काही भविष्य सांगणारी नाही पण माझ्याकडे ठोस कारणं आहेत. मी अभ्यास करुन बोलते, हवेत बोलत नाही. अडचण अशी आहे की भारतीय जनता पार्टीमध्येच प्रचंड धुसफूस सुरु आहे,” असं अंधारे म्हणाल्या.

शिंदे गटाबरोबर सत्तेत असताना भाजपाचं आपल्याच नेते आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करताना अंधारे यांनी, “मी जसं म्हटलं तसं बाहेरच्या लेकरांना आंगडं-टोपडं, त्यांचेच वाढदीवस साजरे होत आहेत. घरची लेकरं उपाशी राहिलेली आहेत. बाहेरचीला बनारसी आणि घरची उपाशी अशी त्यांची (भाजपावाल्यांची) अवस्था झालेली आहे,” असं म्हणाल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here