मुंबई,दि.28: Vegetable Price Hike: परतीच्या पावसाने यंदा दिवाळीपर्यंत राज्यातील अनेक भागात थैमान घातलं. या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतातील भाज्यांचंही यात मोठं नुकसान झालं आहे. महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात दूध, तेल यांसारख्या वस्तूंचे दर वाढलेले पाहायला मिळत असताना आता भाज्याचे दरही गगनाला भिडले आहेत.
भाज्या खराब झाल्याने आवक घटली आहे, याचा परिणाम दरावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाण्यासह उपनगरातील बाजारांमध्ये भाज्यांचे दर तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.
आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे. परिणामी, भाजीपालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार आहे.