मुंबई,दि.4: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं कार अपघातात निधन झालं आहे. पालघर येथे त्यांच्या कारचा अपघातात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पालघर जिल्हा अधीक्षकांनी दिली. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.
“प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.
“पालघरनजीक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे,” अशी मााहिती यावेळी त्यांनी दिली.
सायरस मिस्त्री आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. यातच आता इतके मोठे उद्योगपती असूनही अहमदाबाद ते मुंबई 523 किमीचा प्रवास रस्त्याने का करत होते. त्यांच्याकडे स्वतःचे खासगी विमान असूनही त्यांनी रस्त्याने प्रवास करायचा निर्णय का घेतला असावा, हे आणि असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत.