Dagadi Chawl 2: प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा चित्रपट दगडी चाळ 2

0

दि.19:Dagadi Chawl 2 Review: प्रसिद्ध डॉन अरुण गवळी (Arun Gawali) यांच्यावर आधारित दगडी चाळ (Dagadi Chawl) चित्रपट सुपरहिट झाला. चित्रपटातील डॉन अरुण गवळी यांचा चुकीला माफी नाही हा डायलॉग जबरदस्त गाजला. अभिनेते मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर दगडी चाळ 2 हा चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

2015 साली ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता 8 वर्षांनी याच चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित झाला आहे. ‘सूर्या’ नावाच्या एका सामान्य मुलाचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास आणि त्याची हटके प्रेम कहाणी पहिल्या चित्रपटात पहायला मिळाली होती. आता पुढच्या भागात मात्र गुन्हेगारी विश्व सोडलेला हाच सूर्या पुन्हा या गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो हे पहायला मिळणार आहे.

चित्रपटाची सुरुवात डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांच्या निवडणूक लढण्याची घोषणेने होते. यामुळे सत्ताधारी पक्षातील लोकांचे धाबे दणाणतात. कारण डॅडींना मिळणारा अनेकांचा पाठिंबा. त्यातच एका कामगार नेत्याच्या हत्येमुळे पोलिसांची संशयाची सुई थेट डॅडीपर्यंत येऊन पोहचते. आपल्याला कोणीतरी अडकवत आहे हे लक्षात आल्यावर डॅडी आपला हुकूमी एक्का अर्थात सूर्याला पुन्हा बोलवण्याचा निर्णय घेतात. पण सूर्या चाळ सोडून गावाला निघून गेलेला असतो. डॅडींच्या विनंतीला तो नकार देतो. कारण संसारात अडकलेल्या सूर्याने बायकोला वचन दिलेले असते की तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात जाणार नाही.

मात्र या दरम्यान काही घटना अशा घडतात की डॅडींनी सूर्याला आपल्या ज्या कामासाठी बोलवलेलं असतं त्याऐवजी सूर्या आणि डॅडींमध्ये संघर्ष सुरू होतो… तो यशस्वी होतो का? या दरम्यान नेमकं काय घडतं? यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.

View this post on Instagram

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

एकूणच सत्ता मिळवण्यासाठी गुन्हेगारीचा क्षेत्राचा कसा वापर केला जातो हे या चित्रपटात दाखवले गेले आहे. पहिल्या भागात डॅडींसाठी काम करणारा सूर्या दुसऱ्या भागात डॅडीच्या विरोधात कसा जातो हे यात पहायला मिळणार आहे. दुसऱ्या भागात दिग्दर्शकाने मागच्या भागाशी ठेवलेला फ्लॅशबॅक उत्तम जमून आला आहे. चित्रपट बघताना कुठेही मराठी चित्रपट पाहतो असा भासही होत नाही. चित्रपटातील काही सीन्सवर टाळ्या शिट्या नक्कीच पडणार आहेत.

‘चाळ कधीच काही विसरत नाही’, ‘चाल के दरवाजे लोहे के हैं’ यासारखे संवाद आणखी मज्जा आणतात. चित्रपटाचे संकलन उत्तम आहे, चित्रपट कुठेही रेंगाळत नाही, यात दिग्दर्शकाने बाजी मारली आहे. पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला साजेसे आहेत. बाकी कलाकारांचे अभिनय आणि मकरंद देशपांडेंनी साकारलेले डॅडी लक्षात राहतात. यानिमित्ताने अंकुश आणि पूजाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मिळत आहे. तर डेझी शाह गाण्याच्या रुपात पहिल्यांदा मराठी चित्रपटात दिसली आहे. पाहुणा कलाकार म्हणून अशोक समर्थही उठून दिसतो.

अर्थात या चित्रपटाच्या शेवटी काही अनपेक्षित असे धक्के बघायला मिळतात ज्याची प्रेक्षकांनी अपेक्षाच केलेली नसते आणि जाता जाता हा चित्रपट तिसऱ्या भागाची चाहूल देऊन जातो.

सामन्यात आपल्याकडे चित्रपटाचा पुढचा भाग एक तर निराशावादी असतो अथवा मागच्या भागाशी त्याचा संबंध नसतो. मात्र यात असे नाही, खऱ्या अर्थाने हा चित्रपट पुढचा भाग आहे जो मागच्या भागाला विसरत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here