निवडणूक आयोगानं शिवसेनेचे टेन्शन वाढवलं, उत्तर देण्यासाठी केवळ 15 दिवसांची मुदत

0

मुंबई,दि.11: एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे चालू आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्यालाच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांचा वेळ देण्यास नकार दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरेंना केवळ 15 दिवसांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार दिला आहे. ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे. त्या आधी राज्यातील सत्तासंघर्षावर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टापाठोपाठ निवडणूक आयोगातही उद्धव ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याचं चित्र आहे.

लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेतही आपलं प्राबल्य असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहे. भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती.

शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह 19 ऑक्टोबर 1989 रोजी मिळाले. 7 फेब्रुवारी 2018 रोजी निवडणूक आयोगाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांना पक्षाचे प्रमुख म्हणून कार्यकारणी समितीत निवडण्यात आले. तर उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी 2018 रोजी पाच वर्षांसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेता म्हणून निवड केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here