शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या वादावरून शरद पवारांचं मोठं विधान

0

बारामती,दि.10: शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या वादावरून शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकीय गणिते बदलली. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. तसेच 12 खासदारही शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर शिंदे गटानी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली. 16 बंडखोर आमदारांवरील अपात्रेची कारवाई न्यायालयात प्रलंबित आहे.

बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने, मूळ शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण कोणाचं? याबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे गटाला मूळ शिवसेना कोणाची? याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.

अशी एकंदरीत परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात आणि वेगळं चिन्ह ठरवू शकतात. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत होते.

सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांपासून स्वीकारलेलं हे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं आणि त्यातून वाद-विवाद निर्माण करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर, ते जरूर स्वत:चा पक्ष काढू शकतात आणि स्वत: वेगळं चिन्ह ठरवू शकतात.”

“माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले होते. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह ‘घड्याळ’ घेतलं. आम्ही त्यांचं चिन्ह मागितलं नाही किंवा वाद वाढवला नाही. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत” असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here