मुंबई,दि.24: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची घेतलेली मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेना आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरी गेली. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसेना भवनात बैठका घेऊ लागले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरून बंडखोरांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. बंडखोरांवर घणाघाती टीका करत आहेत. आतापर्यंतच्या सर्व घडामोडींवर आता स्वत: उद्धव ठाकरे आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत.
या मुलाखतीचा हिला टीझर प्रदर्शित झाला आहे. संजय राऊतांकडून हा ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळत आहे. या टिझरमध्ये धनुष्यबाण कोणाचा? ठाकरेंना शिवसेना खरी का खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहे असे रोखठोख प्रश्न विचाारण्यात आले आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या टिझरने मुलाखतीची उत्सुकता वाढवली आहे.
मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे. यात अखेरीस उद्धव ठाकरे यांनी “आता पुन्हा एकदा सामान्यांना सामान्यातून असामान्य लोक घडविण्याची वेळ आली आहे”, असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता शुन्यातून सुरुवात करण्याची आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची तयारी सुरू केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मुलाखतीमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड तसेच शिवसेना पक्षाची आगामी वाटचाल यावर प्रश्न विचारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप – प्रत्यारोप झाले. मात्र उद्धव ठाकरेंकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या टिझरमध्ये संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोलतं केलंय. आता पुन्हा एकदा सामान्य लोकांमधून असामान्य लोक घडवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत बंडखोरांना आवाहन दिले आहे.