भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून वस्त्या होणार समृद्ध
अक्कलकोट,दि.७: तालुक्यातील बोरगाव देशमुख येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांच्या मागणीनुसार बहुजन कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे बोरगाव येथील भिम नगर, अण्णाभाऊ साठे नगर, संत कक्काया नगर, आणि संत रोहिदास नगर या चारही वस्त्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत समृद्ध बनणार आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख हे गाव सहा हजार लोकवस्तीचे गाव असून २०१७ मध्ये थेट जनतेतून सत्तेवर आलेले ग्रामपंचायतीचे सरपंच विलासराव सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत चार ते पाच कोटींची विकासकामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजना, आरोग्य उपकेंद्र, घंटागाडी, अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार योजना, स्वच्छता उपक्रम, समृद्ध शाळा, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, अशी अनेक विकास कामे पार पडली आहेत. मागील अनेक वर्षापासून या गावातील चारही वस्त्या विकासापासून वंचित होत्या. याकरिता गावचे सुपुत्र म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी सदर काम मार्गी लावण्याकरिता प्रयत्न केले. आणि रु. पन्नास लक्ष इतका निधी मंजूर करवून घेतला. या निधीतून चारही वस्त्यांमध्ये हायमास्ट दिवे, अभ्यासिका, व्यायामशाळा, भूमिगत गटार, सिमेंट कॉंक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक, पाणीपुरवठा, सुशोभीकरण आदी विकास कामे साकार होणार आहेत. बोरगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी मिळाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिला. त्याच विचारांचा पाईक होत असताना दुर्लक्षित घटकांसाठी निधी आणण्याचं भाग्य मिळालं बहुजन कल्याण मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेबांनी दिलेले हे योगदान अनमोल आहे. यापुढील काळात ही बोरगाव सह परिसरातील गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे.
प्रा. प्रकाश सुरवसे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर
बोरगावातील चारही वस्त्यांच्या विकासासाठी आजपर्यंतच्या इतिहासात एवढा मोठा निधी कोणीच आणला नव्हता. सरपंच विलासराव सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र प्रा. प्रकाश सुरवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वस्त्यांच्या विकासासाठी दिलेले योगदान आम्ही कधीच विसरणार नाही.
मीना कदम ग्रामपंचायत सदस्या, बोरगाव दे.