मुंबई दि.27: Sanjay Raut On MNS: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मनसेबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. वेगळा गट बनविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी त्यांच्यासोबत असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेत प्रवेश करू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गट राजकारणासाठी नवे पर्याय शोधत असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटातील 38 आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरु आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माध्यमांशी बोलातना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशीही या मुद्द्यावर फोनवर चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी, यामागचे खरे कारण शिंदे गटाला मनसेत प्रवेश करून राज्यातील राजकारणाची नवी समीकरणे निर्माण करायची असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
“बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.