काँग्रेसने भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर घेतला आक्षेप

0

मुंबई,दि.20: काँग्रेसने (Congress) भाजपा आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 10 जागांसाठी मतदान झाले आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ होती. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जगताप यांच्या ऐवजी त्यांची मतपत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती ठिक नाही. परंतु, या दोन्ही आमदारांनी विधानपरिषदेसाठी मतदान केले आहे. मात्र, लक्ष्मण जगताप यांची मतपत्रिका त्यांच्याऐवजी इतर कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुक्ता टिळक यांच्याही मतावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. परंतु, असे असताना लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे मेलवरून तक्रार करण्यात आली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मते रद्द करण्यात यावीत अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका

काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राज्यसभेला त्यांनी मतदान केले होते. विधान परिषदेत त्यांच्यामार्फत प्रतिनिधींकडून मतदान करण्यात आले.

भाजपा नेते संजय कुटे म्हणाले की,  राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसनं या दोघांच्या मतदानावर आक्षेप घेतला ते दुर्देवी आहे असं त्यांनी सांगितले. 

भाजपाने इतक्या त्रासातून त्यांना मतदानासाठी आणायला नव्हतं पाहिजे. त्यामुळे भाजपानं सहानुभूती दाखवायला हवी होती असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. 

निवडणूक आयोगाची घेतली परवानगी

काँग्रेसनं घेतलेले आक्षेप बालिशपणाचे, 3 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे परवानगी घेतली आहे. लेखी परवानगी घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही असेच मतदान घेतले होते. नियमानुसार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे असा टोला भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसला लगावला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here