दि.13: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी निलेश राणे (Nilesh Rane) आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत असे म्हणत निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ताशेरे ओढताना अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात असा टोला लगावला होता. निलेश राणेंच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
निलेश राणे म्हणाले होते
“अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार,” असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
विद्या चव्हाण यांचं उत्तर
निलेश राणे यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. “निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत,” असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
“निलेश राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.