दि.3: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 12 तासांत दहशतवाद्यांनी 2 गैर-काश्मीरींची गोळ्या मारून हत्या (Target Killing In Jammu Kashmir) केली. ज्यामध्ये बिहारचा रहिवासी दिलखुश कुमारचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसरीकडे गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. आतापर्यंत एकूण 4 हत्या झाल्या आहेत. याचा परिणाम म्हणून काश्मिरी पंडितांनी सामूहिकरित्या खोरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी 1800 काश्मिरी पंडितांनी जम्मू खोऱ्यातून स्थलांतर केले असून, सुमारे 3 हजार सरकारी तसेच अन्य कर्मचारी जम्मूत दाखल झाले आहेत.
काश्मिरी पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांनंतर काश्मिरी पंडितांची मागणी लक्षात घेऊन खीर भवानी यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनगरच्या अनेक भागात काश्मिरी पंडितांची निवासस्थाने तसेच संबंधित परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच निमलष्करी पथकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्यांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर पुन्हा एकदा जम्मू खोऱ्यात तणावाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये स्थानिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत एनएसए अजित डोवालही उपस्थित राहणार आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालल्याचे बोलले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण
जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत चालली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएम पॅकेज अंतर्गत कर्मचारी अमित कौल यांनी सांगितले की, परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. पुन्हा 4 हत्या झाल्या आहेत. 30-40 कुटुंबे शहर सोडून गेली आहेत. आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांची (सरकारची) सुरक्षित ठिकाणे फक्त शहरात आहेत, श्रीनगरमध्ये सुरक्षित जागा उपलब्ध नाही.