दि.१९: सध्या रानबाजार या वेबसीरीजची जोरदार चर्चा आहे. अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेबसीरीज धुमाकूळ घालत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसीरिजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे. यात त्या दोघींनीही बोल्ड सीन दिले आहे. यावरुन त्या दोघींनाही ट्रोलही केले जात आहे. नुकतंच या ट्रोलिंगवर तेजस्विनी पंडितने भाष्य केले आहे.
रानबाजार या आगामी वेबसीरिजच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडितने लोकसत्ता.कॉमशी संवाद साधला. त्यावेळी तिने या चित्रपटातील भूमिका, राजकीय विषय आणि बोल्ड दृश्यांवरुन होणारे ट्रोलिंग यावर भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, “मला वैयक्तिक या गोष्टींचा त्रास कधीही होत नाही. याच्या आधी झाला नाही. आताही होत नाही. याच्यानंतरही कदाचित होणार नाही. कारण मी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.”
“कारण मी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मला असं वाटतं जोपर्यंत चर्चा होतेय, ते लोकांपर्यंत पोहोचतंय तोपर्यंत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या गोष्टी कायम असतात. त्याकडे फार लक्ष न देता आपल्याला त्यातील जे चांगलं वेचून घ्यायचं आहे ते वेचून घ्यायचं आणि पुढे निघायचं”, असेही तिने म्हटले.
“कारण ज्यांना शिव्या घालायच्या आहेत, ते फक्त टिझरवर किती वेळ शिव्या घालणार आहेत. त्यांना त्यासाठी सिरीज बघावी लागेल ना… ती बघितल्यानंतर कोणालाच शिव्या घालाव्या असे वाटणार नाही. कारण तशाप्रकारची ही कलाकृती नाही”, असे स्पष्ट मत तेजस्विनीने मांडले.
यादरम्यान तिला कोणते राजकीय नेते सध्या आवडतात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, माझी भूमिका ही उत्तम आहे. मला नितीन गडकरी फार आवडतात. तर शरद पवार यांचे ब्रेन फार आवडतं. नितीन गडकरींचा स्पष्टवक्तेपणा खूप आवडतो. बाळासाहेब ठाकरेंचा जिगर खूप आवडायचा. या सर्व लोकांचे मिश्रण असलेला एखादा नेता आला तर तो मला खूप आवडेल.