नवी दिल्ली,दि.19: मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू होत्या. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्रातून जास्तीत उमेदवार निवडून आणण्याची रणनिती आहे. यासाठी भाजपा मनसे बरोबर युती करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आता दिल्लीत आहेत. ते चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत.
राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा माध्यमांत आहे. ते एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात.
काही दिवसांपुर्वी मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मनसे आणि आमच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमत असल्याचे भाजप नेते वारंवार सांगत आले आहेत. राज ठाकरे दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील त्यांच्यासोबत होते.
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे असे राज्यातील महत्वाचे नेतेही उपस्थित आहेत. यासोबत राज ठाकरेंना या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.
पत्रकारांनी राज ठाकरेंना महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न विचारला असता, “माझ्याकडे आत्ता बोलण्यासारखे काही नाही. मला काही माहीत नाही, फक्त या असे सांगितले आहे,” असे त्यांनी सांगितले. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभेच्या किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.