मुंबई,दि.9: उध्दव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात काय ठरले होते? याबाबत शिंदे गटाच्या आमदाराने खळबळजनक दावा केला आहे. 2019 च्या निवडणुका एकत्र लढूनही शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. उध्दव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचे ठरले होते, असा दावा केला होता. भाजपाने दिलेले वचन न पाळल्याने युती तोडल्याचे सांगितले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर या मुद्द्यामुळे फूट पडली. उध्दव ठाकरे वारंवार अमित शाह यांनी विश्वासघात केल्याचे सांगत आहेत. नुकतेच ठाकरे यांनी मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरले होते असे म्हटले. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. शिरसाट यांनी भाजपा शिवसेनेत अडीच अडीच वर्षाचा फार्मुला ठरल्याचे मान्य केले.
मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरले होते ही गोष्ट आम्ही नाकारत नाही. भाजपाचे 105 आमदार असल्याने पहिले अडीच वर्ष त्यांचा मुख्यमंत्री असेल असंही ठरलेलं. त्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. मात्र उद्धव ठाकरेंचा आक्रमकपणा पाहून भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होऊ द्या या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा शिरसाट यांनी केला.
शरद पवारांनी दिलेल्या प्रस्तावामुळे उद्धव ठकारेंची नियत बदलली. आम्हाला सत्तेची हाव नाही. 5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होऊ द्या. मात्र आपण भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर ठेवू, अशी ऑफर पवारांनी दिली होती. त्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असे संजय शिरसाट म्हणाले.