दि.17:Economic Survey: कोरोनामुळे (Covid-19) देशात अनेक व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. (आर्थिक सर्वेक्षण) कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona First Wave) देशात लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. त्यावर आधारित अनेक छोटे छोटे व्यवसाय बंद पडले. पहिल्या लाटेनंतर परत अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीबांचे हाल झाले. अनेक गरीब लोकांनी व्याजांनी पैसे काढून व्यवसाय, उद्योग सुरू केले होते, असे अनेकजण अडचणीत आले. गरीब आणखी गरीब झाले.
कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. गरिबांसमोर खाण्यापिण्याचे संकट निर्माण झाले होते, तर दुसरीकडे या काळात देशातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. एनजीओ ऑक्सफॅम इंडियाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 102 वरून 142 पर्यंत वाढली आहे.
ऑक्सफॅम इंडियाने आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 चा पहिला दिवस आहे, त्यानिमित्ताने वार्षिक असमानता सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यानुसार, कोरोनाच्या काळात भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती दुप्पट झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की टॉप-10 श्रीमंतांकडे इतकी संपत्ती आहे की ते पुढील 25 वर्षे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये चालवू शकतात.
फक्त 10% लोकांकडे 45% पैसा आहे
कोरोनामुळे विषमता इतकी वाढली आहे की देशातील सर्वात श्रीमंत 10% लोकांकडे देशातील 45% संपत्ती आहे. त्याच वेळी, देशातील 50% गरीब लोकांकडे फक्त 6% संपत्ती आहे.
रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की जर भारतातील टॉप- 10% श्रीमंत लोकांवर 1% अतिरिक्त कर लावला गेला तर त्या पैशातून देशाला 17.7 लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर मिळतील. त्याच वेळी, देशातील 98 श्रीमंत कुटुंबांवर 1% अतिरिक्त कर लावला, तर त्या पैशातून आयुष्मान भारत कार्यक्रम पुढील सात वर्षे चालवता येईल. आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे.
देशातील 98 श्रीमंतांकडे 55.5 कोटी गरीब लोकांची संपत्ती आहे
या आर्थिक असमानता अहवालानुसार देशातील 142 अब्जाधीशांची एकूण संपत्ती 719 बिलियन डॉलर म्हणजेच 53 लाख कोटी रुपये आहे. 98 श्रीमंत लोकांकडे 55.5 कोटी गरीब लोकांइतकी संपत्ती आहे. हे सुमारे 657 बिलियन डॉलर, म्हणजे 49 लाख कोटी रुपये आहे. या 98 कुटुंबांची एकूण संपत्ती भारत सरकारच्या एकूण बजेटच्या सुमारे 41% आहे.
रोज 7.4 कोटी रुपये 84 वर्षे खर्च करू शकतात
अहवालात असे म्हटले आहे की भारतातील टॉप-10 श्रीमंतांनी दररोज 1 मिलियन डॉलर किंवा 7.4 कोटी रुपये खर्च केले तरी त्यांची संपत्ती खर्च होण्यासाठी 84 वर्षे लागतील. दुसरीकडे, जर देशातील श्रीमंतांवर संपत्ती कर लादला गेला तर 78.3 बिलियन डॉलर म्हणजेच 5.8 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात. या पैशातून सरकारचे आरोग्य बजेट 271% वाढू शकते.