दि.16: लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजने विरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. लष्कर भरतीसाठी आणलेल्या नवीन अग्निपथ योजनेबाबत कालपासून सुरू झालेला गदारोळ आजही कायम आहे. आज जेहानाबाद आणि नवादा येथे सेना उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत.
आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार भारतीय लष्करात चार वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. त्यातील 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत पुढील 15 वर्षासाठी दाखल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला मोठा विरोध सुरू झाला आहे.
आज जेहानाबाद आणि नवादा येथे सेना उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. आरा रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ आणि तोडफोड केली. यादरम्यान आंदोलक रेल्वे ट्रॅकशिवाय फलाटावरही चढले. आरा स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलक उमेदवार कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. छपरामध्येही उमेदवारांनी गदारोळ केला आहे. आंदोलक हिंसक झाले असून ट्रेन सुद्धा जाळण्यात आली आहे.
भारतीय लष्करातील कंत्राटी पद्धतीच्या नोकरीविरोधात नवादामधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे दिसत आहे. नवादामधील प्रजातंत्र चौकात विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत गदारोळ केला. सहरसामध्ये सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी रेले रोको आंदोलन केले. काहींनी राजधानी एक्स्प्रेसच्या कोचवर लाठीने हल्लादेखील केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.