वाराणसी,दि.11: : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशमध्ये (UP Election) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच घटना आहे. काही मुख्यमंत्री दोन वेळा झाले आहेत, परंतु सलग दोन वेळा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ असतो. योगी आदित्यनाथांना जनाशीर्वाद याबरोबरच देवाची कृपा झाली आहे असे काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी (Kashi Jagadguru Dr. Chandrashekhar Shivacharya Mahaswamiji) यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
काशीतील विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे विश्वनाथाची कृपा त्यांच्यावर पूर्णपणे झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी केलेली विकास कामे आणि त्यांच्यात भिनलेला राष्ट्रवाद यामुळे ते सर्वप्रिय झाले आहेत. योगीजी मूलतः गोरखपूर मठाचे महंत असून सर्वसंगपरित्यागी आहेत. वडिलांचे निधन झाले असताना अंत्यसंस्काराला न जाता कोविड रुग्णांच्या सेवेत मग्न झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते आपल्या आईलाही भेटले नाहीत. अशाप्रकारे परिवार मोहातून ते पूर्णतः मुक्त आहेत. जनहिताला त्यांनी प्राधान्य दिले आहे. जनतेलाच त्यांनी मायबाप मानले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. प्रत्येक राज्याला योगीसारख्या मुख्यमंत्र्याची गरज आहे. त्यानंतर संपूर्ण भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन भारताची सर्वार्थाने प्रगती होईल असे काशी महास्वामीजी यांनी विजयोत्सवाच्या संदेशात म्हटले आहे.