मुंबई,दि.२०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील लाऊड स्पीकर काढण्याची मागणी केली आहे. 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. मुंबईतील 72 % मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही मशिदींनी पुढाकार घेत या मागणीचे स्वागत केले आहे. मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. नुकतंच हनुमान जयंतीदिनी या मुद्द्याचा राजकीय परिणाम झाल्याचे दिसून आले. मनसेनं आता भोंग्यांच्या मुद्द्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आणला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मस्जिदीत सीसीटीव्ही आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात ३ मे पर्यंचतचा अल्टमेटम दिला आहे. त्यानंतर, राज्य सरकारच्या गृह विभागानेही बैठक घेऊन विनापरवाना आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे, मनसेनं घेतलेल्या या भूमिकेला किंवा मागणीला गंभीरतेनं घेतल्याचं दिसून येत आहे. आता, मनसेनं आणखी एक मागणी केली आहे. भोंग्यानंतर मनसेनं मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.
“जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत, परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. तसेच, प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही बसवल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तर, असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीच नांदगावकर यांनी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेन्शन केलं आहे.