नवी दिल्ली,दि.25: अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय फिलिस्तीन’ची (पॅलेस्टाईनचा) नारा दिला. शपथ घेतल्यानंतर त्यांनी आधी जय भीम, त्यानंतर जयमिम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या. ओवेसी यांनी पाचव्यांदा लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले की, मी प्रामाणिकपणे भारतातील उपेक्षित लोकांचे प्रश्न मांडणार आहे.
‘जय फिलिस्तीन’ घोषणा दिल्यानंतर वाद
शपथ घेताना ‘जय फिलिस्तीन’ (जय पॅलेस्टाईनचा) नारा दिल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे, जेव्हा ओवेसींना तुम्ही दिलेल्या घोषणेला विरोध होत असल्याचे विचारले असता एआयएमआयएम प्रमुखांनी उत्तर दिले की, कोण काय बोलले आणि काय बोलले नाही, सर्व काही तुमच्यासमोर आहे. मी फक्त जय भीम, जय एमआयएम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन म्हणालो… तसेच सर्वांनी काय सांगितले ते ऐका, असेही सांगितले. ओवेसी म्हणाले की, हे कसे विरोधात आहे याबाबत संविधानातील तरतुदी दाखवा.
भाजप नेते जी. किशन रेड्डी यांनी ओवेसींच्या घोषणेला विरोध केला. त्याचबरोबर ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे, याबद्दल ओवेसी म्हणाले की, त्यांचा (जी किशन रेड्डी) विरोध आहे, हे त्यांचे काम आहे. आम्हाला जे म्हणायचे होते ते आम्ही सांगितले आहे. त्यांना खूश करण्यासाठी आपण काही का बोलणार?
भाजपा नेते जी किशन रेड्डी म्हणाले आहेत की, या देशाच्या संसदेत शपथ घेताना जय फिलिस्तीनची घोषणा देणं पूर्णपणे चुकीचा आहे. ते म्हणाले की, एकीकडे ओवेसी संविधानाबद्दल बोलतात आणि दुसरीकडे संविधानाच्या विरोधात घोषणा देतात. तसंच भारतात राहून पॅलेस्टाईनचे गुणगाण गाणं पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटनांमुळे या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. हे लोक रोज प्रत्येक विषयावर असे प्रकार करतात. लोकसभेत अशा घोषणा देणाऱ्यांची ओळख पटवावी, अशी मी जनतेला विनंती करतो, असं ते म्हणाले.