Anti Terrorism Day: गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिले पत्र, घेतला हा निर्णय

0

दि.14: Anti Terrorism Day: केंद्र सरकारने दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाचे मनसुबे उद्ध्वस्त केल्यानंतर केंद्र सरकार आता दरवर्षीप्रमाणे यंदाही दहशतवाद विरोधी दिन साजरा करणार आहे. याबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जाईल. हे पत्र सर्व राज्यांचे मुख्य सचिव, सर्व मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना लिहिले आहे.

तरूणांमध्ये केली जाणार जनजागृती

पत्रात म्हटले आहे की, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तरुणांना दहशतवाद आणि हिंसाचारापासून दूर ठेवण्याचा आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने कोणकोणत्या योजना राबविल्या आहेत, हे त्यांना सांगितले जाईल. याशिवाय त्यांची एक चूक ही राष्ट्रीय समस्या कशी बनू शकते हे त्यांना सांगण्यात येईल. युवक योग्य मार्गावर आले तर दहशतवाद आपोआप संपेल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला.

दिली जाणार दहशतवादविरोधी शपथ

पत्रात म्हटले आहे की, सर्व कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रात दहशतवादविरोधी शपथ दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दहशतवादविरोधी संदेशही प्रसारित केला जाऊ शकतो. 21 मे रोजी शनिवार असल्याने केंद्र सरकारच्या कार्यालयांना सुट्टी असेल, असे या पत्रात म्हटले आहे. अशा परिस्थितीत 20 मे रोजी शपथ घेतली जाऊ शकते. तथापि, राज्य सरकारी कार्यालयांमध्ये किंवा शनिवार सुट्टी नसलेल्या ठिकाणी 21 मे रोजीच शपथ घेण्यात यावी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here