राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्रीपदाच स्वप्न पूर्ण केलं हे तुम्ही लक्षात ठेवलं असतं तर..

0

मुंबई,दि.१२: दैनिक सामनातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन गेल्या दोन दिवसापूर्वी झाला. या पार्श्वभूमीवर  खासदार शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल केले. दोन कार्यकारी अध्यक्षांची नावे जाहीर केली. महाराष्ट्रासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य राज्यांसाठी प्रफुल्ल पटेल यांची नावे जाहीर केली. या निवडीवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेनेचे मुख्यपत्र सामनातून यावर भाष्य करण्यात आले आहे.’ शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल, असं भाष्य अग्रलेखात केले आहे, यावरुन आता राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिले आहे. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी या अग्रलेखावरुन संजय राऊतांवर टीका केली आहे. सुरज चव्हाण म्हणाले, राऊत साहेब तुमच्या पक्षाच तुम्ही पाहा, अजित पवार परत आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच स्वप्न पूर्ण झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्रीपदाच स्वप्न पूर्ण केलं. हे तुम्ही लक्षात ठेवलं असतं तर तुम्हाला अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती. आमची भाकरी फिरली का नाही हे पाहण्यापेक्षा तुमची  चुलीवरची भाकरी आणि चूल ज्यांनी पळवून नेली त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

दैनिक सामना अग्रलेख

‘भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील. शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल, असं भाष्य या अग्रलेखात म्हटले आहे. 

मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली?, असा सवालही यात केला आहे. 

‘गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूगर्भात असंतोषाचा लाव्हा उसळत होता व त्याचा केंद्रबिंदू अजित पवार असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. शरद पवार यांनी साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळय़ात पक्षाच्या अध्यक्षपदातून मुक्त होण्याची घोषणा केली व तेव्हा सगळ्यांना एकच झटका बसला. तसा झटका सुप्रिया, पटेलांच्या नव्या नियुक्तीने बसला नाही. सुप्रिया सुळे यांच्याकडेच पक्ष संघटनेची सूत्रे जातील हे नक्की होते, पण दुसरे कार्यकारी अध्यक्ष पटेल यांना नेमून पवार कोणता संदेश देत आहेत? सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्याने घराणेशाहीचा आरोप होऊ नये यासाठी त्यांनी आणखी एक कार्यकारी अध्यक्ष नेमला असावा, असंही यात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here