पुणे,दि.५: Supriya Sule On Vijay Shivtare: राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. आज देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून मोदी सरकार याकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केलेल्या आरोपांबाबतही प्रतिक्रिया दिली. तसेच पुणे पोटनिवडणुकीतील निकालावरून भाजपालाही लक्ष्य केलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? | Supriya Sule
“देशात महागाई आणि बेरोजगारीवर मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून यावर बोलतोय. आज देशातील उत्पादकता कमी झाली आहे. कांद्याच्या नियोजनाचा अभाव आपण गेल्या आठवड्यात बघितला. देशात कांद्याला भाव नसताना, जगात कांद्याला प्रचंड मागणी होती. अशा वेळी सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा होते. मात्र, तसे निर्णय झालेले दिसत नाही”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
तर या परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे…
यावेळी बोलताना, विरोधकांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राबाबतही प्रतिक्रिया दिली. “विरोधी पक्षाच्या ज्या भावना आहेत, त्या एका पत्राद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पोहोचवल्या असतील तर या परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे. पुढच्या आठवड्यात संसदेचं सत्र पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे हे सर्व मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे”, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाकडून मुंबईत आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात विचारलं असता, “आम्ही लोकशाही विचाराचे आहोत, त्यामुळे ज्यांना वाटेल त्यांनी यात्रा काढाव्यात. यात्रा काढणं हा त्यांचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवतारेंच्या आरोपावर दिली प्रतिक्रिया | Supriya Sule On Vijay Shivtare
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला होता. यासंदर्भात विचारलं असता, “मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. कारण याबाबत मला काहीही माहिती नाही. आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत”, असे त्या म्हणाल्या.