Solapur News: शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

0

सोलापूर,दि.२८: Solapur News: शिवसेना आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. निधी वाटपावरून महाविकास आघाडीत खदखद कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एवढच नाही तर “आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय.” असंही तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलं आहे. (Solapur News)

युवा सेनेचे वरिष्ठ नेते वरुन सरदेसाई यांच्या उपस्थितीत सोलापूरात सोमवारी युवा सेनेचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आमदार सावंत यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पमध्ये देखील हेच दिसून आलं आहे. ६०-६५ टक्के बजेट राष्ट्रवादीला, ३० ते ३५ काँग्रेसला, उरलेल्या १६ टक्क्यातहीही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ १० टक्के मिळतात. राष्ट्रवादीचे साधे ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपयांचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो अन् आम्हाला केवळ गोड बोललं जातं’ अशा शब्दांत सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Solapur News)

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु’ असा सूचक इशाराही सावंत यांनी भाजप पेक्षा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिला आहे. मागील अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी शिवसैनिकांना फोडल्याचे अनेक दाखले देत सावंत यांनी आपल्या पक्षावरील जणू अन्यायाचा पाढाचं यांनी वाचला.

“नुकतच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे. मागील दोन-अडीच वर्षांमध्ये सर्व माध्यमं देखील दाखवत आहेत आणि आम्ही देखील सभागृहाच्या बाहेर बघतोय आणि आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, मग कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडामधील असतील आमच्या सगळ्यांची मानसिकता एक झालेली आहे. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळत आहे आणि हे अर्थसंकल्पातून देखील प्रतिबिंबित झालेलं आहे. विरोधी पक्षांनी ओरडायचं त्यांचे काम आहे त्यांना ते करू द्या. तथ्य काय आहे तर तथ्य हेच आहे. आज ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जातं. जवळपास ३०-३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं. शिवसेनला १६ टक्के बजेट दिलं जातं. या १६ टक्के बजेट मधलं आज उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमचे असल्याने पगारावरतीच सहा टक्के जातं, मग विकासासाठी काय? विकासासाठी केवळ १० टक्के आहे.

खेदाने व्यक्त करतो माझ्या मतदारसंघात असेल, उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा सोलापूर, यवतमाळच्या देखील जिल्हाप्रमुक संपर्क प्रमुखांचे मला फोन असतात, की त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील हसन मुश्रीफांकडे जाऊन एक-दीड कोटींची कामे घेऊन येतो आणि आपल्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, खासदाराचा तर विषयच येत नाही आणि मग शिवसेनेसाठी काय? नुसतच गोडगोड. आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आम्ही सहन करणार, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत.” असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला.

स्वप्नात तरी सत्ता पहिली होती का?

‘ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादाला लागू नाका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणका बसला तर आईचे दूध आठवेल. मागील अडीच वर्षात झाला तसा केवळ अपमानचं होणार असेल तर साहेब वेगळा विचार करायला हवा’ अशी आर्जवही आमदार तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here