सोलापूर,दि.19: Solapur Fire News | सोलापूर कारखान्यातील भीषण आगीत होरपळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर (Solapur News) येथील अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या आठजणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यात एका वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. सुमारे तेरा तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरु होते. आगीचे कारण समजू शकले नाही.
Solapur Fire News | सोलापूर कारखान्यातील भीषण आगीत होरपळून 8 जणांचा मृत्यू
उस्मान हसन मन्सुरी (वय 78), अनस हनिफ मन्सुरी (वय24), शिफा अनस मन्सुरी (24), युसूफ अनस मन्सुरी (वय 1) तसेच दुसर्या कुटुंबातील मेहताब सय्यद बागवान (वय 55), आशाबानो मेहताब बागवान (वय 52), सलमान मेहताब बागवान, हिना मेहताब बागवान (वय 26, सर्व रा. अक्कलकोट रस्ता, एमआयडीसी) अशी मरण पावलेल्या आठजणांची नावे आहेत. अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीतील ई-83 या प्लॉटमध्ये उस्मान मन्सुरी यांचा सेंट्रल टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीज नावाचा टॉवेल निर्मितीचा कारखाना आहे.

त्याच कारखान्याच्या आवारात ते कुटुंबासह वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या या कारखान्यात अचानक आग लागली. या आगीची माहिती अग्निशामक दलाला समजताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली. परंतु, आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे शहरातील सर्व अग्निशामक केंद्रातील बंब व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्याचप्रमाणे चिंचोळी एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट, पंढरपूर नगरपरिषद येथील अग्निशामक यंत्रणा दाखल झाली. कारखान्यात मालकासह त्यांचे कुटुंबीय व अन्य काही कामगार अडकल्याने आपत्कालीन यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारीही याठिकाणी पोहोचले. परंतु, आग विझविण्यात अडचणी येऊ लागल्याने जेसीबी, क्रेन मागविण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने कारखान्याच्या कम्पाउंड वॉलचा काही भाग पाडण्यात आला. तसेच इमारतीच्या खिडक्या व अन्य ठिकाणचा भाग पाडून त्यातून आग विझविण्याचे काम सुरु केले. बचावकार्य करणार्या पथकाला बेशुध्दावस्थेत असलेले तिघेजण आढळून आले. त्या तिघांना तत्काळ रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेला कच्चा माल, कोंब, तयार टॉवेल आदींमुळे आग भडकत होती. तब्बल 13 तासांच्या प्रयत्नानंतर मन्सुरी कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यात यश आले. परंतु, तेथे असणार्या पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यांचे शव तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यावेळी मन्सुरी, बागवान यांच्या कुटुंबीयांचा व नातेवाइकांचा आक्रोश अनावर झाला. ते हृदयद्रावक दृश्य पाहून तेथे असणार्या मित्रमंडळी व नागरिकांचे डोळेही पाणावले. त्या पाचजणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.