मुंबई,दि.29: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला होता. एकतर आमदारांना अपात्र ठरवलं जाईल किंवा त्याआधी आमदारांना इतर पक्षात विलीन व्हावं लागेल. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिवसेंदिवस पुढे जाताना दिसेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष, तिरस्कार शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसतोय. परंतु हा द्वेष, तिरस्कार महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. भावनेच्या भरात, काहींना फसवून शिंदे गटात सामील केलेय. त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल असा दावा संजय राऊतांनी केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आणि दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार आणायचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांना एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे. डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वादळांमध्ये शिवसेनेचे पाठिशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या भेटीतून शिंदे यांना नक्कीच बोध मिळेल. ते एकनिष्ठतेसारख्या गोष्टी त्यांच्याकडून शिकतील, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.
प्रत्येकाचे एक स्वप्न असते. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे असते. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही, लोकांकडून लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना इथेच आहे. ते कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. त्यांना अधिकार काय आहे. हा पोरखेळ चालला आहे. त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात नाहीत. ज्या वृक्षाच्या सावलीत मोठे झाले, फळे खाल्ली. आपण बाजूला झालेला आहात, आपण दुसरा पक्ष स्थापन करावा आणि आपले आस्तित्व दाखवा, असे ते म्हणाले. राज्यात सत्तांतर होईल या मताशी ठाम आहे, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा दौरा करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. राज्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या आहेत. यातून वेळ काढून मुख्यमंत्री राज्यात फिरणार असतील तर यावर टीका करण्यासारखे काही नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.