रामायण आणि महाभारत आपली संस्कृती: जावेद अख्तर

0

मुंबई,दि.10: रामायण आणि महाभारत आपली संस्कृती आहे असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश… इतकंच काय तर, पदरेशही सजला आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं.

काही लोक आश्चर्यचकित झाले असतील की राज ठाकरे यांना अजून कोणी दुसरा सापडलं नाही का बोलवायला? याची दोन कारणे आहेत. एक तर आमची चांगली मैत्री आहे आणि दुसरी गोष्ट ही की मी राम आणि सीता यांना मानतो. काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत. माझ्यासारखे नास्तिक आहेत ते सुद्धा त्यांना मानतात. हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम यांची गोष्ट करतो तेव्हा ते राम आणि सीता हेच आहेत. रामायणामध्ये राम आणि त्यांचे भावंड हे नातं सुद्धा अद्भुत आहे. रामाला जो वेगळं करेल तो रावण… जय सियाराम. आज पासून जय सियाराम हेच म्हणायचं अशी शाब्दिक फटकेबाजी प्रसिद्ध संवाद लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केली. मनसेच्या वतीने शिवाजीपार्क येथे दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे आभारही मानले.

साचेबद्ध विचारांना शह देणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करत काही सुरेख विचार सर्वांपुढे ठेवले. हिंदुत्त्व, भक्ती या साऱ्यापलीकडे जात संस्कृती आणि वासरा या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. चित्रपटांच्या दुनियेतील काही गोष्टींचा उलगडा करणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळी ‘राम’ हा विचार एका वेगळ्या दृष्टीकोनातून मांडला.

‘श्रीराम किंवा सीता हे फक्त हिंदूंचाच वारसा आहेत, त्यांच्याच धार्मिक अस्मितेचा मुद्दा आहेत असं नाही, मी असं समजतच नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाचे, पृथ्वीवरील स्वत:ला हिंदुस्तानी समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रामायण हा एक सांस्कृतिक वारसा आहे. रामायण किंवा महाभारताविषयी माहिती नाही असा एकही हिंदुस्तानी सापडणार नाही. कारण हाच आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली ओळख आहे’, असं अख्तर यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी बालपणीच्या काही आठवणी सर्वांपुढे आणत म्हटलं, ‘मी मुळचा लखनऊचा आहे. त्यामुळं लहानपणी आम्ही कायमच काही गोष्टी ऐकल्या आहेत. Good Morning वगैरे म्हणणारी माणसं जरा जास्तच उच्चभ्रू असतात, नाहीतर रस्त्यावरून चालणारे सर्वसामान्य नागरिक मात्र ”जय सिया राम…” असंच म्हणत होते. थोडक्यात काय, तर या दोघांना (राम आणि सीतेला) वेगळं करण, तसा विचारही करणं एक पापच आहे. हा तर प्रेम, एकता आणि सहजीवनाचा एक आदर्श आहे.’ सिया आणि राम यांना फक्त एकाच व्यक्तीनं वेगळं केलं ते म्हणजे रावणानं, त्यामुळं यांना जो वेगळा करेल तोच रावण असेल असं सांगताना त्यांनी ‘जय सिया राम’च्या घोषणा दिल्या आणि उपस्थितांनीही हाच सूर आळवला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here