महापालिका निवडणूक निकालावर राज ठाकरे म्हणाले यावेळेस..

0

सोलापूर,दि.१७: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात २४ महापालिकेत भाजपने बाजी मारली आहे. यात काही महापालिकात भाजप शिवसेना (शिंदे गट) युती केलेली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडिया (X वर) पोस्ट करत म्हटलं आहे की, यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही.

राज ठाकरेंची पोस्ट

सस्नेह जय महाराष्ट्र,  सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे.  ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. 

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. 

तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. 

लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! ! 

आपला नम्र 

राज ठाकरे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here