सोलापूर,दि.27: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. X वर पोस्ट करत राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला.
या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अनेकांनी अभिनंदन केले. राज ठाकरे यांनीही मनोज जरांगे पाटील यांचे यशस्वी आंदोलनाबाबत अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं सूचक विधान त्यांनी केले.