खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

0

सोलापूर,दि. 8: खरीप हंगाम 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ http://www.pmfby.gov.in कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 असल्याने त्वरित अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

योजनेमधील जोखमीच्या बाबी

1. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान- खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/ लावणी न झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे.

2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान- सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळेल.

3. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट- टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई मिळेल.

4. स्थानिक नैसर्गिक आपत्ती- गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.

5. काढणी पश्चात नुकसान- ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते, अशा कापणी/ काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हे करा

शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याबाबतची माहिती 72 तासांच्या आत संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक आहे. काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीम अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/ कृषि व महसूल विभाग यांना त्वरित कळवावे. नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशिल कळविणे बंधनकारक असेल.

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये योजना भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स 20 वा मजला दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई 400023, ई मेल pikvima@aicofindia.com, टोल फ्री. 18004195004 या विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्यासाठी विहीत मुदतीपूर्वी नजीकच्या बँक / आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा / न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करुन योजनेत सहभागी करुन घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.

योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक पेरणी / लावणीपुर्व नुकसान भरपाई / हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान / स्थानिक आपत्ती या जोखमींच्या बाबीकरिता नुकसान भरपाईची पुर्तता करतील. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित व काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखमींच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडुन विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.

समाविष्ट पिके

जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये खरीप ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मूग, कापूस, उडीद, तूर, मका व कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

पिकनिहाय विमा हप्ता

भुईमुग- 29000 (संरक्षित रक्कम) -580 (शेतकरी हिस्सा), खरीप ज्वारी -25000- 500, बाजरी -22000- 440, सोयाबीन 45000- 900, मुग- 20000-400, उडीद -20000-400, तुर – 35000-700, मका – 6000- 120, कापूस- 23000-1150, कांदा- 65000-3250.

योजनेत सहभागासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतीम ग्राह्य धरले जाईल.

पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते क्र., पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रं. इ. खातरजमा करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here