सोलापूर,दि.२२: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रख्यात वक्ते प्रविण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना अधिकृत निवडीचे पत्र साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिले. त्यानंतर संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेने शरद गोरे यांचे आभार मानले आहेत.
प्रवीण गायकवाड यांनी ६ ग्रंथाचे लेखन केले असून परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आजवर त्यांनी सामाजिक व ऐतिहासिक विषयांवर ३ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. लोकाभिमुख वक्ते म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. आतापर्यंत 60 पेक्षा जास्त देशात जाऊन तेथील आर्थिक चळवळीचा त्यांनी अभ्यास केला आहे. भारतातून प्रत्येकवर्षी शेकडो तरुण गायकवाड यांच्या संकल्पनेतून परदेशात नौकरी आणि व्यवसायसाठी जात आहेत. इतिहासामधील अनेक वादग्रस्त प्रसंगावर गायकवाड यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली आहेत.
पुढील मे महिन्यात 9, 10 रोजी कऱ्हाड येथे होणाऱ्या या संमेलणाला राज्यातून हजारो साहित्यिक, वाचक श्रोते उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक साहित्य संमेलणाला प्रवीण गायकवाड यांची निवड केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शाम कदम, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले यांनी शरद गोरे यांचे आभार मानले आहेत.
उदघाटक म्हणून खा. शरद पवार
९ व १० मे २०२५ हे संमेलन कराड येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा केंद्रीय मंत्री तसेच खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती साहित्यिक गोरे यांनी दिली.