शिर्डी,दि.९: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) राज्य सरकार गंभीर आरोप केले आहेत. एसटी आंदोलक संप मागे घ्यायला तयार नाहीत. एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटीच्या विलिनीकरणाची मागणी न्यायालयानं नेमलेल्या समितीनंही फेटाळून लावल्यामुळं पेच आणखी वाढला आहे. दुसरीकडं या संपावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन आज शिर्डीत झालं. त्या प्रसंगी आंबेडकर यांनी एसटी संपाबाबत भूमिका मांडली. एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला राजकीय पक्ष होता. अडचणीत येण्याइतपत आंदोलन ताणू नये असा सल्लाही आम्ही दिला होता. मात्र, काही उपटसुंभ कामगार नेत्यांच्या पाठीमागे लागल्यानं एसटी कामगारांची फसगत झाली, असं आंबेडकर म्हणाले. एसटी महामंडळाचा निरोप दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पाठवण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाहीत. हे चोर आणि लुटारूंचं सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. जेवढे दिवस कामावर गेला नाहीत, त्याची नुकसान भरपाई घेतली जात आहे. पगार कपात होत असल्यामुळं कामावर जावं की नाही, असा प्रश्न कामगारांपुढं आहे. एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल, असं आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं.
‘सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचं आहे. सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांचा हाच प्रयत्न आहे. सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या खासगी बसेस चालवायच्या आहेत. त्यासाठी संप हे त्यांना साधन मिळालं आहे,’ असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या ‘पेनड्राइव्ह’वरून सध्या राजकारण तापलं आहे. त्यावरही आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फेरफार केली जाऊ शकते. फॉरेन्सिक लॅब जोपर्यंत हे सत्य आहे असं सांगत नाही, तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देऊ नये. ते शिष्टाचाराला धरून नाही,’ असं ते म्हणाले.